१० नोव्हेंबर २०११

" निष्ठा "... रक्तातच असावी लागते !


खरं सांगू.... आम्ही विज्ञानवादी अर्थात बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर... तथागत बुद्धांचे अनुयायी असल्यामुळे ज्योतिष... शकून-अपशकून, कर्म कांडावर आमचा विश्वास नाही ; पण श्रद्धा (अंधश्रद्धा नव्हे).. निष्ठा आणि निती, या गोष्टींवर किमान मी तरी विश्वाश ठेवतो... तसे आचरणही करतो... असो. तुम्ही म्हणाल, मग आम्हाला काय त्याचे?... आहे.. त्याच्याशी तुमचाही संबंध आहे म्हणूनच तर लिहिण्याचा हा खटाटोप केलाय...

... तर सांगण्याचा मुद्दा असा आहे. (थोडे विषयांतर होईल, पण समजून घ्या.) तुम्ही ज्या समाजात जन्माला आले. ज्या संस्कृतीने तुमचे भले-बुरे सोचले.. ज्यांनी तुम्हाला किमान माणूस म्हणून ओळख दिली.. ज्यामुळे तुम्हाला माणसासारखे जगण्याचे बळ मिळाले.. त्याच्याशी आपण कितपत एकनिष्ठ आहोत? .. पशूपेक्षाही हीन जीने आमच्या वाट्याला होते... ज्या समाज व्यवस्थेने आम्हाला माणूसपण नाकारले.. जे ३६ कोटी देवही आम्हाला माणूस म्हणून स्वीकारण्याची आज्ञा देण्यास मजबूर आणि लाचार होते... तेव्हा युगानुयुगे चालले हे अन्याय मोडीत काढण्यासाठी पृथ्वीतलावर एक मसीहा अवतरला. त्याचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर... त्याने प्रस्थापित समाजव्यवस्थे विरुद्ध बंड पुकारले. (आम्हाला म्हणजे फक्त महारांना नव्हे तर तमाम मागासवर्गीयांना) माणूस म्हणून जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही हा मूलमंत्र दिला. शिका-संघटीत व्हा अन आपल्या हक्कासाठी संघर्ष करा.. हा मुल मंत्र दिला.. आम्ही (फक्त पुर्वाश्रामिंच्या महारांनी आत्ताच्या बौद्धांनी) तो शिरसावान्ध्य मानला... बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले.. हा समाज बाबासाहेबांना.. त्यांच्या विचारांना एकनिष्ठ राहिला... बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार शिकला-सवरला... कृती केली...

नतीजा काय ? या समाजाला त्यामाध्यमातून एक नवी दिशा.. नवी उर्जा... नवी उर्मी ... नवे तेज.. एक चैतन्य.. दृष्टी आणि आत्मभान आले... परिणाम काय...? या देशात थोडे बहुत का असेनात पण मोक्याच्या पदांवर पुर्वाश्रामिंचे महार आणि आताचे बौद्ध विराजमान झाले... ते कोणाच्या मेहरबानीने नाही तर बाबासाहेबांचे उपकार आणि स्वतःच्या बुद्धीच्या बळावरच.

वाईट या गोष्टीचे वाटते की आमचे लहान भाऊ मांग, चांभार,ढोर अर्थात sc -st - obc - vjnt - सर्वच मागास प्रवर्गातील समाजांनी एक तर बाबासाहेबांना खुल्या अंतकरणाने स्वीकारले नाही... त्यांच्या विचाराशी प्रतारणा केली... त्यांनी जो सामाजोद्धाराचा मूलमंत्र दिला.. त्याची थट्टा करून हिंदू संस्कुतीचेच आम्ही वफादार आहोत, हे दर्शविण्याचा केविलवाणा आकांत केला ... आजही तोच प्रयत्न सुरु आहे... त्यामुळे हा समाज आज सर्वार्थाने पिछाडीवर राहिला...

इथे मूळ मुद्दा आला '' निष्ठा''............! बौधेत्तर समाज निष्ठावान राहिला नाही... मराठा-ब्राह्मणांचे मांडलिकत्व त्या समाजाने स्वीकारले... परिणाम~~~~~? पूर्वाश्रमीचे महार आत्ताचे बौद्ध सोडून अन्य सर्व मागासवर्गीय हे मागासवर्गीयच राहिले...पण आपला हा दोष आणि चूक आजही ते स्वीकारायला तयार नाहीत, हे त्यांचे दुर्दैव म्हणावे... उलट ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपणास गुलाम म्हणून वागविले त्या प्रस्थापित समाजाला वफादार असल्याचे दर्शिवाण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या भावंडाशी (महारांशी /बौद्ध) बेवफाईच केलेली आहे. याची कित्येक उदाहरणे देता येतील. बौद्धेत्तर किती आणि कोणता दलित समाज हा मुळात रिपब्लिकन पक्ष आपला समजतो? (अलीकडे या पक्षाचे नेते चुकले असतील पण या पूर्वी ?)

सांगायचे हे आहे की, तमाम दलितांनी जर बाबासाहेब स्वीकारले असते... त्यांच्या विचारांचे आचरण केले असते तर आजचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते...  असो, सत्य हे नेहमीच कटू असते मित्रांनो... हे आपणास कदाचित पचणार नाही.. पण प्रयोग करून पहा ... परिणाम अत्यंत सकारात्मकच येईल...

'' आमच्या घरात मूल जन्माला येते तेव्हा... अगोदर त्याला सर्वप्रथम आई आणि
दुसरा -जयभीम- हा शब्द उच्चारण्यास शिकवला जातो'' हि आहे निष्ठा आणि श्रद्धा...''









०७ नोव्हेंबर २०११

विद्यापीठ गेटने ओलांडली चाळिशी !


                                                           नामांतरापुर्वीचे गेट                                 नामांतरानंतरचे गेट

वयाने चाळिशी ओलांडली की वार्धक्याकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणतात... वार्धक्य हे तसे सर्वार्थाने दुर्लक्षित जीवन.. मग ते मानवी जीवन असो की, निर्जीव वास्तूचे...
असो, मुद्दा असा आहे कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ........हे नाव समोर आले की समोर चित्र उभे राहते ते ऐतिहासिक सामाजिक समतेच्या.... परिवर्तनाच्या लढ्याचे...! एरव्ही विद्यापीठ म्हटले कि ज्ञान दानाची एक सर्वोच्च संस्था, अशी विध्यापिठाची सर्वसाधारण प्रतिमा समोर येते. या विध्यापिठाबद्दल मात्र तसे होत नाही. हे देखील ज्ञानदानाचे सर्वोच्च केंद्र आहे. मात्र अन्य विध्यापिठाच्या तुलनेत या विध्यापिठाची ओळख वेगळी आहे... इतिहास वेगळा आहे. 

आता आपणास प्रश्न पडला असेल कि ठीक आहे पण हे सारे सांगण्याचे आत्ता औचित्य काय ? हा खटाटोप कशासाठी ? तर मित्रहो, आहे औचित्य... काय आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हटले कि समोर येते ती विद्यापीठगेटची प्रतिमा. त्यामुळे जगातील ही एकमेव वास्तू असेल ज्यामुळे संपूर्ण विद्यापीठ तर ओळखले जाते. काल रविवारी ६ नोव्हेंबररोजी या गेटने वयाची चाळीशी ओलांडली आहे.मात्र दुर्दैव हे कि त्याची आठवण ना प्रशासनाला होती, ना समाजाला..! हे विद्यापीठगेट म्हणजे समतेच्या लढ्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हे विद्यापीठगेट म्हणजे सामाजिक परिवर्तन लढय़ाची प्रेरणा.. अर्थात विद्यापीठ नामांतराचे प्रेरणास्रोत म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्याशिवाय आंबेडकरी समाजाचे एक श्रद्धास्थान म्हणूनही ती वास्तू ओळखली जाते. नामांतराचा लढा म्हणजे या गेटवरील पाटी बदलण्याचा लढा नव्हता. ती प्रतीकात्मकदृष्ट्या सामाजिक समतेची लढाई होती. यासाठी तब्बल १७ वर्षे संघर्ष करावा लागला. मराठवाडाच नव्हे तर विदर्भ, खान्देशात आंबेडकरी समाजातील अनेकांना शहीद व्हावे लागले. अनेक महिला विधवा झाल्या. अनेक मुले अनाथ झाली. अनेकांच्या घरांची राखरांगोळी झाली..! 

शेवटी १४ जानेवारी १९९४ रोजी राज्य सरकारने मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केला अन् या गेटवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' अशी अक्षरे झळकली.. तेव्हापासून हे गेट म्हणजे आंबेडकरी समाजाचे श्रद्धास्थान बनले. दरवर्षी १४ जानेवारी रोजी भोळीभाबडी आंबेडकरी जनता या गेटची मनोभावे पूजा करते.. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत. या श्रद्धेने ते गेटपुढे नतमस्तक होतात..एवढे मोठे पावित्र्य या गेटला दिले असेल तर मग आज ही जनता किंवा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते.. विद्यापीठ प्रशासनालाही गेटच्या ४0 व्या वर्धापन दिनाचे भान का बरे नसावे? वर्षातून केवळ तीन वेळेसच या गेटला रोषणाई केली जाते. त्यापैकी एकदा १४ जानेवारी रोजी नामांतर वर्धापन दिनानिमित्त. दुसरे १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य म्हणून आणि तिसरे म्हणजे २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो तेव्हा. चार तपांचा साक्षीदार असलेल्या या गेटच्या उभारणीचा आज वर्धापन दिन होता. केवळ सभा-समारंभ घेतल्यावरच ती वास्तू पुनीत होते असे नव्हे तर किमान या दिवशी सदरील वास्तूची आठवण जरी केली तरी ते पुरेसे आहे; पण ते या गेटच्या नशिबी नाही, हे दुर्दैव!

या गेटच्या उभारणीचा इतिहासही तसा रंजनकारकच आहे. ज्या अभियंत्याने ही सुंदर वास्तू अवघ्या ३५ दिवसांत उभी केली ते विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीपसिंग छाबडा आजही हयात आहेत. सध्या त्यांचा सिंधी कॉलनीत निवास आहे. यासंदर्भात ते सांगतात की, डॉ. आर. पी. नाथ यांनी १९७१ मध्ये ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात होणार्‍या पदवीदान समारंभासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित केले होते. या समारंभापूर्वी विद्यापीठ गेटची उभारणी करावी, असा डॉ. नाथ यांचा आग्रह होता. एवढय़ा अल्पकाळात एवढी मोठी वास्तू उभारण्यास तेव्हा शहरातील एकाही वास्तूविशारदाने अनुकूलता दर्शविली नव्हती. मग हे आव्हान विद्यापीठाचे निवासी अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी स्वीकारले. त्यांनी विद्यापीठातील मजूर सोबत घेऊन लोडबेअरिंग या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यास सुरुवात केली. ६ नोव्हेंबर १९७१ ला या गेटच्या उभारणीचे काम सुरू केले अन् १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर अशा वास्तूचे लोकार्पण झाले. विद्यापीठाचा लोगो या वास्तूद्वारे साकारला आहे. यामध्ये अजिंठा येथील बौद्ध शिल्पही साकारण्यात आलेले आहे. या गेटची उंची २९.३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट एवढय़ा रुंद आहेत.